मुंबई
राज्यात काँग्रेसला नव ऊर्जा देण्यासाठी आक्रमक भूमिका मांडणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनी पुन्हा एकदा थेट भाजपला लक्ष्य केले आहे. ‘भाजप चलेजाव’ असा नारा देऊन देशात लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याचे आवाहनही केले आहे.
नाना पटोले म्हणाले, देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 5000 वर्षे संघर्ष करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट देशात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना मात्र मागील काही वर्षात ही सर्व व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. 2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे. सर्वच वर्गाला खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेले आज संविधान व्यवस्था बदलण्याचे काम करत आहे. लोकशाहीच्या चार स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली आहे.
काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान
जुलमी, अत्याचारी इंग्रज सरकारला ९ ऑगस्ट १९४२ साली ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘चले जाओ’चा नारा दिला गेला आणि देशभर हे आंदोलन उभे राहिले. ‘चले जाव’च्या आंदोलनाने इंग्रज सत्तेला हादरा बसला आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र होऊन देशात लोकशाही व्यवस्था आली. या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. मात्र स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही. त्या विचारसणीचे लोक आज सत्तेत असून मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या करत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.