पुणे|
राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पुणे मेट्रोतून केलेल्या सफरीवरून आता राजकीय आखाड्यात पुण्यात मेट्रो कुणी आणली यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये श्रेयाचे राजकारण पेटणार असल्याचेच अधोरेखित झाले आहे मात्र समाजमाध्यमांवर दावे – प्रतिदावे करण्यात येत असले तरी, निवडणुकीच्या काळात हाच मुद्दा गाजणार आहे मात्र या श्रेयाच्या राजकारणात ज्या काँग्रेसने मेट्रोसाठी पुढाकार घेतला, ती पुण्यात अलिप्तवादी भूमिका घेईल की दावा ठोकेल हाच मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरणार आहे.
शरद पवार यांनी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते मनपा भवन पिंपरी चिंचवड या मेट्रोची पाहणी केली, यादरम्यान त्यांनी मेट्रोची फेरी देखील केली. तत्पूर्वी पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या प्रकल्पाची पवारांनी आस्थेने माहिती घेतली. मात्र पवार यांच्या या पाहणी दौऱ्यावरून समाज माध्यमांवरील अनेक गटात श्रेयाचे राजकारण सुरु झाले आहे. पुण्यात मेट्रो आणली, ती भाजपच्या कारभाऱ्यांनी असा दावा करताना राज्यात आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाल्याकडे लक्ष वेधले जात आहे. तर राष्ट्रवादीकडून ठराव कुणी दिला हा मुद्दा पुढे केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय अभ्यासकांच्या मतांनुसार देशात सर्वप्रथम मेट्रो कुणी आणली तर ती काँग्रेस पक्षानेच. बोगोटा शहरानंतर मेट्रो दिल्लीत धावू लागली आहे,सुमारे १९३. २ किलोमीटरपेक्षा अधिक जाळे सुरुवातीला निर्माण झाले . स्टेशनची संख्याही वाढली आहे आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पेरेशनही काँग्रेसच्या काळातच स्थापन झाली हे मेट्रोवरून सुरु झालेल्या श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर विसरून चालणार नाही. विशेष म्हणजे त्यावेळी भूमिपूजन कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधानांनी कोणताही गवगवा केला नाही. त्यातही जेएनएनयुआरएम योजनेनंतर्गत राज्या-राज्यामधील प्रत्येक शहरासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे दोन लाख कोटी रुपयेही काँग्रेसच्या काळात वितरित केले;पण सत्तेवर येताच भाजपच्या सरकारने ही योजनाच बंद करून स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत तर केलेच शिवाय काँग्रेसच्या काळात झालेल्या योजना,आखण्यात आलेल्या नियोजनाचे श्रेय लाटण्यात आले. एकप्रकारे भाजपकडून ”आयत्या पिठावर रेघोट्या ” ओढण्याचाच उद्योग झाल्याचा काँग्रेसचा आरोप म्हणावा तसा गाजला नाही. किंबहुना तो गाजवण्यात काँग्रेस कमकुवत ठरली. पुण्याच्या मेट्रोसाठी श्रेय लाटण्याचा प्रकार सुरुच आहे ;पण मुळात शहरासाठी पर्यायाने पुणेकरांच्या हितासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी मेट्रोचा पर्याय हा काँग्रेसनेच आणला होता. २००६ पासून काँग्रेसचे पदाधिकारी मेट्रोसाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. मात्र श्रेय लाटण्यासाठी विद्यमान पंतप्रधानांच्या हस्ते ”इव्हेंट” करण्याची चाल भाजपची होती.त्यामागे राष्ट्रवादीलाही गारद करण्याची रणनीती होती. मेट्रो इलेव्हेटेड की भूमिगत यावरूनही पुणे पॅटर्नच्या काळात कलगीतुरा रंगला होता. आता पुन्हा हा वाद पेटणार आहे ;पण ठराव कुणी, कोणत्या पक्षांनी आणि कधी कधी दिले होते हे जर पुन्हा पुणेकरांसमोर आले तर पुणे मेट्रोचे श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी पुणेकरांना पुन्हा एक ‘पॅटर्न’ दिसेल असा ठाम दावा राजकीय अभ्यासकांचा आहे.
… त्या योजनेचे फलित
पुणे शहराला या तत्कालीन जेएनएनयुआरएम योजनेनंतर्गत सुमारे अडीच हजार कोटी रुपये मिळाले, आज शहराचा जो कायापालट झाला आहे,हे त्या योजनेचे फलित आहे आणि राजकीय वर्तुळात तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला हे आजही मान्य केले जाते.बीआरटी योजना गाजली आणि वादग्रस्तही ठरवली गेली. मात्र ज्यांनी त्यावरून रान उठवले त्या पक्षांनी मात्र पुणे पॅटर्नच्या सत्तेत शहरात 27 प्रमुख रस्त्यांवर बीआरटी प्रस्तावित असताना रस्त्यांचे रुंदीकरण केले. केंद्राकडून 548 कोटी रूपयांचा निधी बीआरटीसाठी आला; पण तो रस्ता रुंदीकरणासाठी वापरला गेला. आज पुणे शहरात मेट्रो होत आहे ;पण मेट्रोसाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा अहवाल त्यानंतर झालेल्या घडामोडी विसरून चालणार नाही.त्यावेळी विविध विकासकामांवर मेट्रो येणार हे माहित असताना सुद्धा कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आणि त्यानंतर जमीनदोस्त करण्याचा कारभारही झाला.