मुंबई|राज्य सरकारला वेठीस धरण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
कार्डिया क्रूझवर झालेल्या धाडीमध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईचा भांडाफोड करणाऱ्या मुख्य पंच प्रभाकर साईल याने पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. आपल्या जिवाला धोका असून आपल्याला पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्यानंतर प्रभाकर साईलला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे अशी माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. कार्डिया क्रूझवर केलेल्या धाडीनंतर एक-एक नवीन खुलासे समोर येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाली असून, त्यात चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी वेगवेगळे आरोप लावले आहेत. मात्र अद्याप नवाब मलिक यांच्यासोबत या आरोपांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या नवाब मलिक नांदेडला असून ते मुंबईला परत आल्यानंतर याबाबत चर्चा केली जाईल, असे संकेतही गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर राज्य सरकार तसेच राजकीय व्यक्तींना वेठीस धरण्यासाठी केला जात आहे.याअगोदर कधीही अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणेचा उपयोग केला गेला नव्हता.पण सध्याची परिस्थिती पाहता, राज्य सरकार तसेच राजकीय व्यक्तींना वेठीस धरण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.