मुंबई ।संजय राऊतांना (Sanjay Raut)खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटक होऊ शकते. त्यांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केला. तसेच, तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकार पाळीव प्राण्यांप्रमाणे करत आहे, अशी घणाघाती टीकाही केली.
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका (Uddhav Thackeray, Sanjay Raut, Aditya Thackeray strongly criticized the opposition in the press conference) केली.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा सुपारी घेतल्याप्रमाणे काम करत आहे. केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे त्यांचा वापर होत आहे. केंद्र सरकार म्हणेल त्यांच्या अंगावर या यंत्रणांना बेकायदेशीरपणे सोडले जात आहे. देशात अशी उदाहरणे आपण रोजच पाहत आहोत. अशा यंत्रणांना केंद्र सरकारच्या यंत्रणा म्हणता येणार नाही. अशा यंत्रणा कायमच्या बंद का करु नये, असा प्रश्न आता पडत आहे.
केंद्र सरकारकडून न्यायव्यवस्थाही अंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीच न्यायव्यवस्थेवर केंद्राचे काही नियंत्रण हवे, असे वक्तव्य केले आहे. सध्या देशात न्यायालये हे सामान्यांचे एकमेव आशास्थान असताना त्यांनाच आता बुडाखाली घेण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. सर्व जनतेने याला विरोध केला पाहिजे.असे ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray: Use of investigation agencies like pets!)