नागपूर
उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. मोदींच्या भाजपा सरकारची 5 वर्षांची लोकप्रियता उधळणीला लागली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात योगी सरकारने बट्ट्याबोळ करून ठेवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प. बंगाल होणार आहे त्यामुळेच प्रतिमा सुधारण्यासाठी डागडुजीचे काम सुरू आहे.त्यानुसारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका ही उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याची टीका ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांनी केली आहे.
ते नागपुरात महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेनंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले कि, दलित विषयक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आरक्षणवादी आहेत हे लक्षात ठेवून त्यांना खुश करण्यासाठी होसबळे बोलले. त्यामुळे ती भूमिका प्रामाणिकपणाची वाटत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास पाहता, त्यांची भूमिका आरक्षणमुक्त भारत आहे. यात होसबळे यांनी मांडलेली भूमिका ही आरएसएसने जर भूमिका बदलली असेल तर त्यासाठी त्यांनी जनतेची माफी मागायला पाहिजे. आतापर्यंत आमची आरक्षण विरोधी भूमिका होती. त्याबद्दल आम्ही देशाची माफी मागतो आणि आमच्या भूमिकेत आम्ही बदल करत आहोत, असे सांगावे. पण त्यांनी तसे केले नाही, म्हणजेच त्यांची भूमिकाही आरक्षणविरोधी आहे, असेही नरके यांनी यावेळी स्पष्ट केले.