नवी दिल्ली।महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. काल तर हद्दच झाली. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करण्यात आले . दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची (BJP) सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. काल महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही. हा देश एक आहे. मी अमित शाह यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावे ,अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) लोकसभेत (Lok Sabha)भाजपला सुनावले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये (dispute between Maharashtra and Karnataka)सीमेवरील काही गावांवर दावा सांगण्यावरून सुरू असलेला वाद पुन्हा चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातल्या ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याचे समोर आल्यानंतर हा वाद वाढला. त्यात सोमवारी सीमाभागात काही मराठी भाषिकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना त्याचे पडसाद देशाच्या संसदेतही उमटलेले पाहायला मिळाले.दरम्यान,खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर त्याला महाराष्ट्रातील इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनीही दुजोरा देत टीका करायला सुरुवात केली. कर्नाटकच्या या भूमिकेचा आणि वर्तनाचा आम्ही धिक्कार करतो, असे म्हणत महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.एकीकडे सुप्रिया सुळे आणि इतर खासदार आक्रमक होत असताना दुसरीकडे कर्नाटकमधील हवेरी मतदारसंघाचे भाजपा खासदार शिवकुमार उदासी यांनी यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते नेहमीच अशा प्रकारे वर्तन करतात. जेव्हा ते सत्तेतून पायउतार होतात, तेव्हा हे अशा प्रकारे वर्तन करतात , अशा शब्दात त्यांनी सुप्रिया सुळे आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांना प्रत्युत्तर दिले.
केंद्र सरकार त्यात काय करणार?
दरम्यान, या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये खडाजंगी सुरू असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मध्यस्थी करत सगळ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले मात्र सुप्रिया सुळेंची मागणी फेटाळून लावत दोन राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र सरकार काय करणार? ही संसद आहे. हे अजिबात चालणार नाही,असेही ते म्हणाले.