मुंबई|
महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही वाकणार नाही,अशा शब्दात विरोधकांचा समाचार शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी घेतला आहे.
माध्यमांशी बोलताना केंद्रातील भाजप सरकारवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला. तसेच, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे यावरून बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली आहे.
ते म्हणाले ,आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे;पण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या शत्रूंना एक धडा ४०० वर्षांपूर्वी जो शिकवला, तो असा आहे की महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि शत्रू जर अंगावर आला, तर त्याची बोटे छाटली जातील. प्रतापगडावर तर अफजल खानाचा कोथळाच निघाला आणि २५ वर्षे लढून देखील औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्येच मृत्यू पत्कारावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला देशाला माहीत आहे. हाच धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूंनी समजून घेतला पाहिजे, असे राऊत म्हणाले आहेत.
… शिवचरित्र वाचावे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj) विचारातून आणि प्रेरणेतून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. हा भगवा जो फडकतो आहे आणि आज सगळ्यांना अचानक जे भगव्याचे प्रेम उफाळून आले आहे. त्याचे प्रमुख जे प्रेरक होते, ते अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे कोणाला असे वाटत असेल की दिल्लीचे तख्त त्याचा वापर करून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना आम्ही झुकवू, गुडघे टेकायला लावू, पण त्यांनी एकदा आजचा अग्रलेख तर वाचायलाच हवा आणि त्यांना शिवचरित्र वाचावे लागेल, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut)यांनी विरोधकांवर निशाणा साधला.