सांगली |वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीत सहभागी झाल्याने सत्ताधारी युतीला कोणताही मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाही. मात्र, महाविकास आघाडीत फूट पडणे अटळ आहे, असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले.
खरी भीमशक्ती आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पुढाकाराने महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला तरी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांच्या युतीला काहीही फरक पडणार नाही, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमध्ये उमेदवारीवरून मतभेद होतील आणि आघाडीला खिंडार पडेल, असे आठवले म्हणाले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दावा करतात त्याप्रमाणे राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार पडण्याची कोणतीही शक्यता नाही. ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि आगामी निवडणुकीत मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे साडेतीनशे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे साडेचारशे खासदार निवडून येतील, असा दावाही आठवले यांनी केला. (Ramdas Athawale: So the split in the Mahavikas Front is inevitable)