औरंगाबाद । मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या अजेंड्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आलेल्या मनसेवर (MNS) भाजपची सी टीम (BJP’s C-team) असे खापर फुटत आहे. ३मे पर्यंत मशीदीवरील भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा पठण केले जाईल असा पवित्रा घेणाऱ्या मनसेला आता पोलिसांनीच ‘शॉक’ दिला आहे. १ मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेलाच अद्याप परवानगी मिळालेली नाही,त्यात आता येत्या ९ मे पर्यंत औरंगाबाद शहरात पोलिसांनी (Aurangabad police) जमावबंदी आदेश लागू केल्याने (Crowd ban in Aurangabad, ‘mace’ on Raj Thackeray’s meeting ) राज ठाकरेंच्या सभेवरच ‘गदा’ आली आहे. शिवाय मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.
पुणे दौऱ्यात राज ठाकरे यांनी आगामी काळातील दौऱ्यांबद्दल माहिती दिली होती. औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार औरंगाबादमधील सभेची मनसेकडून जोरदार तयारीही केली जात आहे. मात्र, सभेची घोषणा झाल्यानंतर औरंगाबादेतील विविध पक्ष-संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यातच आता औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.त्यामुळे राज ठाकरेंची सभा गोत्यात आली आहे. त्याआधी ज्या मैदानासाठी मनसे आग्रही होती, त्याऐवजी पोलिसांनी दुसरे मैदान सुचवले होते मात्र मनसे मराठवाडा सांस्कृतिक मैदानाच्या आग्रहावर ठाम राहिली. मात्र आता औरंगाबाद पोलिसांनी येत्या ९ मे पर्यंत शहरात जमावबंदीचे आदेश लागू केल्याने राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेला शॉक बसला आहे.
आदेशात उल्लेख…
विशेष म्हणजे औरंगाबाद पोलिसांनी मनसेच्या सभेचाही आदेशात उल्लेख केलेला आहे. मनसेकडून हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून, त्याला विविध पक्ष, संघटनांकडून विरोध होत आहे. या संघटनांकडून आंदोलने केली जाण्याची दाट शक्यता आहे.संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निर्दशने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे. हा जमावबंदी आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात २५ एप्रिल २०२२ पासून ते ९ मे २०२२ च्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे.