पुणे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra of Congress leader Rahul Gandhi) सहभागी होण्यासाठी पुणे जिल्ह्यातून ५000 पेक्षा अधिक कार्यकर्ते जाणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान ते सहभागी होतील. त्या काळात शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan)यांनी काँग्रेसमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संघटनात्मक दृष्ट्या पक्षाचे ६० जिल्हे असून त्यांच्यावर यात्रेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी चिंचवड, जिल्हा यांच्यामार्फत केलेल्या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तिन्ही विभागातून पाच हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते बुलढाणा जिल्ह्यात जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक युनिटवर यात्रेत कोठे सहभागी व्हायचे, त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात विध्वंसक व द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशाला मानसिकदृष्ट्या एकसंध करण्यासाठी राहुल गांधी यांनी ही पदयात्रा काढली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी यात्रा निघाली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांना येण्याची विनंती करण्यात आली आहे. सहयोगी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समविचारी पक्षाच्या लोकांना एकत्रित करून ही यात्रा काढण्यात येत आहे आणि देशात सर्वत्र त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.(Bharat Jodo Yatra of Congress leader Rahul Gandhi)