पुणे।
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा स्तुती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘मोदी है, तो मुमकिन है’ अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून ही स्तुती करण्यात आली आहे. त्यातही मोदींचा चेहरा नसेल तर भाजपामधील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांमध्येही पराभूत होतील यावर अग्रलेखात विशेष भर दिला आहे. काल – परवा पर्यंत मोदी- शहा ही जोडी देशाला सर्वश्रुत होती. मात्र भाजपचे अध्यक्ष जे.पी . नड्डा यांच्या कार्यपद्धतीवरही विशेष भाष्य करण्यात आले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात जे आहे, ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे. उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलामागे हेच दिसून आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री एका फटक्यात बदलण्यात आले.संपूर्ण मंत्रिमंडळ नवेकोरे करून टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते; पण आता मोदी- नड्डा यांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही. रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मोदी व नड्डा यांनी घरी बसवले. ज्या 24 मंत्र्यांनी शपथ घेतली. ते सर्व प्रथमच मंत्री झाले. नितीन पटेल यांच्यासह सर्व जुन्या जाणत्यांना मोडीत काढले. हा नवा डाव गुजरातमध्ये मोदी व नड्डा यांनी मांडला आहे. राजेंद्र त्रिवेदी हे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनाही पायउतार केले व मंत्री केले रूपाणी यांच्यामागे अमित शहा यांचे पाठबळ होते; पण रूपाणी व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला घरचा रस्ता दाखवून मोदी- नड्डा जोडीने एक जोरदार राजकीय संदेश स्व पक्षास दिला आहे. त्यात मावळते उपमुख्यमंत्री नितीन पटेल ते स्वतःला ’हेवीवेट’ समजत होते. रूपाणी यांना मुख्यमंत्री केले. तेव्हाही नितीन पटेल हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते व आता रूपाणी यांना बाजूला केले. तेव्हा इथेही तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. एक तर ते गुजरातमधील पाटीदार समाजाचे महत्वाचे नेते आहेत व पाटीदार समाजात त्यांचे वजनही आहे. मात्र गुजरातमध्ये झालेल्या आंदोलनापासून पाटीदार समाज अस्वस्थ आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार समाजाच्या असंतोषाचा फटका बसेल आणि गुजरातमध्ये भाजपची मोठी फजिती होईल, याचा अंदाज आल्याने रूपाणी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ घरी पाठवले; पण नेतृत्वाची घडीच बदलून टाकताना पाटीदार समाजाचे नितीन पटेल यांनाही मोडून काढले. नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 14 मंत्री पाटीदार- ओबीसी समाजाचे आहेत. हे एक धाडसाचे काम असले तरी स्वपक्षात असे धाडसी पाऊले मोदीच टाकू शकतात.