पुणे| आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्यपालांची स्वाक्षरी झाल्याने आता तीन सदस्यांचा प्रभाग यावर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र ‘दोन पेक्षा कमी नाही आणि चारपेक्षा जास्त नाही’ यामुळे जिथे आवश्यक असेल तिथे दोन किंवा चारचा प्रभाग होईल पण त्याची संख्या कमी राहणार आहे.
आता पुणे शहरात बंडखोरी आणि शह- काटशहाच्या राजकारणात जर पक्षातूनच घात झाला तर… या भीतीने विद्यमानांनी आणि इच्छुकांनी व्यक्तिगत कामांचा ‘लेखाजोखा’ घेऊन चाचपणी सुरु केल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे.
पालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे आणि लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत नव्याने निर्देश दिले जाणार आहेत.यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाने दोन सदस्यांचा आग्रह धरला आणि काँग्रेसनेही तीच भूमिका लावून धरली पण शिवसेनेने तीन सदस्यांचा प्रभाग हा निर्णय कायम ठेवला. वरकरणी हे चित्र दिसले. प्रत्यक्षात हे सगळं ठरवून या सदरात होते हेही स्पष्ट झाले आहे.
नव्या प्रभाग रचनेत जमेच्या बाजू कोणत्या आणि फटका कुठे बसू शकतो याचा आढावा सर्वच पक्षातील विद्यमान असो किंवा इच्छुक आता घेत आहेत. त्यात भाजपमध्ये इच्छुकांची ‘ मांदियाळी’ वाढणार असली तरी बंडखोरी , पक्षांतराला भाजपला सामोरे जावे लागणार आहे. त्यात नाराजांची समजूत कशी काढणार ? या पेचात भाजप अडकणार आहे. राष्ट्रवादी पक्षात यंदा युवकांना संधी देताना जुन्यांचा समन्वय साधला जाणार असला तरी अप्रत्यक्ष घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते का ? तसेच बाहेरून पक्षात दाखल होणाऱ्यांना किती स्थान मिळते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. तर काँग्रेसमध्ये एका घरात किती ‘ तिकिटे’ तसेच पूर्वाश्रमीच्या माननीयांना , नेत्यांच्या कुटुंबियातील सग्यासोयऱ्यांना संधी दिली जाते का ? याकडेही काँग्रेस निष्ठावंतांचे लक्ष आहे. त्यात काँग्रेसमध्ये नवी फळी नसल्याने किती जागांवर पक्षाचे नगरसेवक निवडून येतील याचे ठोकताळेही मांडले जात आहे. मनसेमध्ये पुन्हा वर्चस्व कसे मिळवता येईल, यानुसार रणनीती सुरु आहे. स्थानिक पातळीवर मनसेला जमेची बाजू असली तरी मतांचे विभाजन हा मुद्दा अडसर आहे.सर्वच पक्षातील अनेकजण अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी करत असले तरी पक्षाच्या चिन्हांवरच विजयाचे गणित सुकर होणार असल्याने आतापासूनच छुप्या पद्धतीने पर्याय शोधला जात आहे. आपसह एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यासह अन्य छोटे पक्षही रिंगणात उतरणार असल्याने मतांच्या विभाजनाचा फटका कुणाला बसतो आणि या पक्षातील कितीजणांना सभागृहात दाखल होण्याची संधी मिळते हेही यंदा महत्वाचे ठरणार आहे. प्रभाग रचनेसह मतदारसंख्या किती याकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे. एकच्या प्रभागात अपक्षांना असलेली सुवर्णसंधी मात्र आता संपुष्टात आली आहे.