कोल्हापूर । केंद्र सरकारमुळेच देशात प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे. भाजप(BJP) देशाचा सत्यानाश करत आहे. मात्र कोल्हापूरमधूनच भाजपच्या पतनाची सुरुवात होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते . यावेळी त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मोत्सवाचे दर्शन घेतले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची सुरुवात केली. अशा या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे , अशी भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले,भाजप हे आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ तोंडासमोर आरक्षणाबाबत ते बोलत असतात. मात्र, भाजपच्या मनात आरक्षणाला विरोध आहे. राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी केला आहे.
… भाजपचा थयथयाट
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बोलताना नाना पटोले म्हणाले हे सर्व भाजपचे कटकारस्थान आहे. जेव्हा पहाटेचे सरकार पडले तेव्हापासून भाजप थयथयाट करत आहे. त्याचेच परिणाम हे सध्या दिसून येत आहेत. भाजपचे सरकार असतानादेखील एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण होऊ शकत नाही, असे ते म्हणाले होते. याबाबतचे व्हिडिओदेखील व्हायरल झालेले होते. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आपले आमदार पाठवून एसटी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचेदेखील हाल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.