नागपूर । वकील सतीश उकेंवर (ED’s action against lawyer Satish Uke) ईडीच्या कारवाईनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज एकाच (Devendra Fadnavis And Nana Patole In Same Flight) विमानातून मुंबई ते नागपूर पर्यंतचा प्रवास केला. यावर नाना पटोलेंना विचारले असता, ‘देवेंद्र फडणवीस हे कायम माझे मित्र आहेत. राजकीय विरोध असू शकतो;पण मनभेद नाही, त्यामुळे पत्रकारांनी याला वेगळ्या दिशेने नेऊ नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राज्यात ईडीच्या कारवाईवरून भाजपा (BJP) आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरू असताना आणि नुकताच सतीश उकेंवरील ईडीच्या करवाईनंतर फडणवीस आणि पटोले यांचा एकत्र विमान प्रवास केवळ योगायोग आहे का की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
गेल्या काही काळात राज्यात काँग्रेसचा ( CONGRESS ) वाढता प्रभाव दिसून आल्यानंतर ही भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. मला बदनाम करण्यासाठी माझे वकील सतीश उकेंवर ईडीची कारवाई झालेली आहे. भाजपचे मनसुबे कधी यशस्वी होणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. तसेच ‘सतीश उके हे माझे वकील आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात आणि रश्मी शुक्ला मानहानी प्रकरणात ते माझे वकील आहेत. त्यामुळे त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. मुंबई ईडीची टीम नागपूरला येऊन कारवाई करते आणि नागपूरच्या कार्यालयाला त्याची साधी कल्पना देखील देण्यात येत नाही. याचाच अर्थ असा होतो की, केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून मोठ षडयंत्र रचले जात असल्याचेही पटोले म्हणाले.