मुंबई । मुंबई पर्यायाने महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी वाढत्या टीकेमुळे आता नरमाईची भूमिका घेतली आहे.मात्र राज्यपालांनी केलेले वक्तव्य आगामी निवडणुकात भाजपला (BJP)महागात पडू शकते यामुळेच राज्यपालांनी सारवासारव केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातही शिवसेनेला (shivsena) पुरते गारद करण्याची रणनीती राज्यपालांच्या वक्तव्यामुळे अंगलट येऊ शकते, हे लक्षात घेऊन राज्यपालांना खुलासा करण्याचे फर्मान केंद्रातून काढण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
राज्यपालांनी खुलासा करताना म्हटले आहे की, काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात, मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.(Why did the governor soften after the controversial statement) मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्यामुळेच अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले.