मुंबई ।मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Election) महाविकास आघाडी सरकारने प्रभागांची संख्या वाढवून २३६ केली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने (Eknath Shinde and Devendra Fadnavis government)त्यात बदल करून पुन्हा २२७ प्रभाग केल्याने नव्याने आरक्षण लॉटरी काढावी लागणार आहे. तसेच प्रभागानुसार नव्याने मतदार याद्या कराव्या लागणार आहेत. परिणामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. कोरोनामुळे निवडणूक वेळेवर होऊ शकलेली नाही. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पालिकेच्या प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ केली. त्यानुसार ३१ मे ला ओबीसी शिवाय आणि सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण दिल्यावर २९ जुलैला ओबीसीसह आरक्षण लॉटरी काढण्यात आली. यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च झाला होता. लॉटरी प्रक्रिया पार पाडणे, मतदार याद्या बनवणे आदी कामासाठी पालिकेच्या ३०० कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पालिका निवडणूक २३६ ऐवजी २२७ प्रभागानुसार होईल असा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे पालिकेने केलेला खर्च आणि कर्मचाऱ्यांनी केलेली मेहनत वाया गेली आहे.
मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग होते. त्यात महाविकास आघाडी सरकारने ९ प्रभागांची वाढ करून २३६ प्रभाग केले. पालिकेने त्यानुसार ३१ मे आणि २९ जुलै रोजी प्रभाग आरक्षण लॉटरी काढली. आता सरकारने प्रभाग रचना २२७ केल्याने पुन्हा नव्याने प्रभाग आरक्षण लॉटरी काढावी लागणार आहे. नव्याने लॉटरी काढण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. पालिकेने २३६ प्रभागानुसार मतदार याद्या बनवण्यात आल्या आहेत. आता २२७ प्रभाग झाल्याने पुन्हा नव्याने मतदार याद्या तयार कराव्या लागणार आहेत. पालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल असे सांगण्यात आले होते. मात्र नव्याने आरक्षण लॉटरी काढावी लागणार असल्याने तसेच मतदार याद्या तयार कराव्या लागणार असल्याने निवडणुकीला (Mumbai Municipal Election) उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नव्या प्रभाग रचनेचा फायदा भाजपलाच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निश्चित मिळणार आणि मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात राहणार असा दावा राजकीय निरीक्षकांचा असून निवडणूक जितकी लांबेल,त्याचा भाजपला फायदा होण्यापेक्षा ते शिवसेनेच्या पथ्यावर पडेल असेही राजकीय अभ्यासकांचे मत आहे.