सत्तेच्या सारीपाटासाठी कधी कोणती समीकरणे घडवली जातात याचा काही नेम नसतो. प्रस्थापित पक्षांना विशेषतः सत्तेत असणाऱ्या पक्षांना चारीमुंड्या चित करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत मोटही बांधतात हे काही नवे नाही; मात्र मतविभाजन होणार नाही अशीच काळजी घेऊन आघाड्या केल्या जातात. आता राज्याच्या राजकारणात (Maharashtra politics)सत्तेतून पायउतार झालेल्या महाविकास आघाडीत नवा पक्ष सामावून घेण्याची रणनीती आखली जात आहे. एकनाथ शिंदे – देवेन्द्र फडणवीस (Eknath Shinde – Devendra Fadnavis) पर्यायाने भाजपला (BJP) सत्तेतून पायउतार करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र या मोर्चेबांधणीतून नक्की कुणाला फायदा होणार? कोण कुणाचा वचपा काढणार ? एकगठ्ठा मतांचे समीकरण कुणाचे बिघडणार आणि सत्तेत असलेल्या घटक पक्षाला त्याचा तोटा कसा बसणार यासह नवा पर्याय कुणाला तारक आणि कुणाला मारक ठरतो हा मुद्दा आता शिवशक्ती-भीमशक्ती आघाडीचे (Shivshakti-Bhimshakti alliance)संकेत मिळाल्याने महत्वाचा ठरणार आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi)प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच एका व्यासपीठावर एकत्र येत नव्या मैत्रीचे संकेत दिले. प्रबोधनकार.कॉम’ या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्ती आघाडीचे संकेत दिले.त्यानंतर आता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही अनुकुल असल्याचे सांगितले आहे.मात्र समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी मतविभागणी होत नसेल तर आमची तयारी आहे, पण तयारी एका बाजूने असून चालत नाही. तयारी दोन्ही बाजूंनी असावी लागते. यापूर्वी अनेकदा आरपीआयमध्ये कवाडे गट, गवई गट, आठवले गट यांच्याशी आघाडी करुन निवडणुका लढविल्या आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केल्याने वंचित बहुजन आघाडी कुणाचे मतांचे समीकरण बिघडणार हा मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरणार आहे. जर शिवशक्ती-भीमशक्ती आघाडी झाली तर ठाकरे गटाला शिंदे गटाला शह देणे सहज शक्य होणार आहे. शिवाय महाविकास आघाडीतील जागा वाटपांचे सूत्रही पथ्यावर पडणार आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र लढली आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्या तर भाजपला सत्तेतून पायउतार करताना शिंदे गटाच्या आमदारांना घरचा रस्ता दाखवता येईल आणि जास्तीच्या जागा सहजरित्या जिंकण्याची संधीही प्राप्त होऊ शकेल. याचा सर्वाधिक फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच होईल तर शिंदे गटाला धोबीपछाड देऊन वचपा काढल्याचा आनंद शिवसेनेला होईल मात्र वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर हे सर्व अवलंबून राहील. त्यात अनेक सरकारांमध्ये सत्तेत राहणाऱ्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या ‘आरपीआयची ‘मात्र वंचित बहुजन आघाडीमुळे मोठी कोंडी होणार आहे.तसेच भाजपला जमेचे ठरणारे ‘आरपीआय’च्या मतांचे समीकरणही बिघडणार आहे. त्यामुळे हा नवा प्रयोग झाल्यास त्याचा सर्वाधिक तोटा हा भाजपला तर बसणार आहे शिवाय आरपीआयच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण होणार आहे. असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. असे असले तरी मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) – वंचितच्या आघाडीच्या चर्चा आहेत. याबाबत स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले आहे. मात्र ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले होते . पण काँग्रेससोबत आपली चर्चा झाल्याचे आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लागल्या होत्या.त्यात आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी मतविभागणी होत नसेल तर आमची तयारी असून वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘ग्रीन सिग्नल ‘दिला आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर यांच्याशीही त्या-त्यावेळी चर्चा करण्याचा प्रयत्न झाला. आर.आर. पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली होती. आम्हीही त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी तयार आहोत.या विधानामुळे आणखी एक नवा पॅटर्न राज्याच्या राजकीय पटलावर आगामी काळात पहावयास मिळतो का हाच खरा मुद्दा आहे.(Maharashtra politics: … a new pattern for vote division!