मुंबई।
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपकडून (BJP) सातत्याने जोरदार प्रयत्न होत आहेत. इतकंच काय अनेक वादग्रस्त मुद्दे उकरले जात आहेत. वाद निर्माण केले जात आहे.आभासी चित्र रंगवून दिशाभूल करण्याचे कारस्थान सुरु आहे. अभिनेत्री कंगना राणावत (actress Kangana Ranaut) प्रकरण महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून ईडीच्या चौकशीचा फेरा कसा सुरु आहे आणि त्यात ईडी नक्की कुणासाठी राबत आहे ,हेही भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya)यांच्या प्रकरणातून दिसून येत आहे. असे असले तरी कंगना असू द्या किंवा सोमय्या यांच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. त्यामुळेच त्यांना कडक सुरक्षा केंद्राकडून मिळाली आहे. त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे, ती म्हणजे खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची. त्यांनाही केंद्राकडून ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणाऱ्यांना केंद्र सरकारकडून (central government is providing security) सुरक्षा कवच दिले जात आहे,हेच अधोरेखित होत आहे.
महाराष्ट्राची बदनामी करणारी कंगना राणावत
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचा (SHIVSENA ) वाद सर्वानाच माहीत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येनंतर कंगनाने महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. बॉलिवूडमध्ये सरकारला हाताशी धरून ड्रग्सचा व्यापार केला जातो. याबाबत पोलिसांना ही सर्व माहिती असून त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही अशाच प्रकारचे गंभीर आरोप कंगनाकडून करण्यात आले. या वादा दरम्यानच मुंबई महानगरपालिकेकडून कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाचा काही भाग अनधिकृत असल्याचे म्हणत तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. त्या नंतर कंगना अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या कारवाईनंतर कंगणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं होतं. या सर्व वादावर कंगना आणि राज्यसरकार यांच्यात कायदेशीर लढाई देखील सुरू आहे. मात्र या वादातच कंगणाला केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली.मात्र कंगनाने भाजपला खुश करण्यासाठी वाट्टेल तसे आरोप करत महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोपही गाजला होता. एकप्रकारे भाजपची स्क्रिप्ट या नजरेने त्यावेळी या प्रकरणाकडे पाहिले गेले होते.
झेड सुरक्षा असतानाही अज्ञातवासात जाणारे किरीट सोमय्या
महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनादेखील केंद्र सरकार कडून झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे माजी मंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर अनेक मंत्र्यांवर त्यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्य सरकार आणि किरीट सोमय्या यांच्यात नेहमीच वाद होताना पाहायला मिळतात. दोन वेळा यांच्यावर हल्लेही झाले आहेत. मात्र त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे युद्ध नौका आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करण्यात गैरव्यवहारप्रकरणी सोमय्या हे आता अडचणीत आले आहेत. शिवाय त्यांनी निधी भाजपच्या खात्यात जमा केल्याचे न्यायालयात सांगितल्याने भाजपची अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणावर लवकरच सुनावणी होणार आहे मात्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज करून सोमय्या हे तब्बल पाच दिवस अज्ञातवासात गेले होते. न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाल्यानंतर ते अवतरले आहे मात्र झेड सुरक्षा असतानाही ते कसे काय गायब झाले हाच मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरला आहे. सोमय्यांना देण्यात आलेल्या झेड सुरक्षा अंतर्गत त्यांच्यासोबत 22 जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे .त्यात 4 ते 5 एन एस जी चे कमांडो, एक एस्कॉर्ट वाहन, आणि इतर जवान आहेत. त्यांच्याकडून अहोरात्र त्यांची सुरक्षा या टीमकडून केली जाते.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या नवनीत राणा
खासदार नवनीत राणा यांना देखील आता केंद्राने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या वादावरून स्थानिक पोलीस आणि खासदार नवनीत राणा यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला होता. या झालेल्या वादात स्थानिक पोलिसांकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक पोलिसांकडून देण्यात आली. बेकायदेशीररित्या पोलीस आपल्या घरात घुसले होते. पोलिसांनी आपल्याला व आपल्या कुटुंबाला ही धमकावलं असे गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केले होते. त्याची दखल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी घेऊन नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे नवनीत राणा या नेहमीच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोलत असतात. लोकसभेत तर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नसल्याकारणाने राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी अशी मागणी देखील नवनीत राणा यांनी केली होती.आता नवनीत राणा यांना केंद्राकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्यासोबत 11 जणांची टीम रात्रंदिवस त्यांची सुरक्षा करणार आहे. या टीम मध्ये 2 कमांडो आणि अर्ध सैनिक दलाचे जवान असणार आहेत.