अहमदाबाद।
कोरोना महामारीच्या फटक्यातून सावरत देशाची अर्थव्यवस्था ही बळकट झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद येथील शारदाधाम भवनच्या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हे भाष्य केले.
ते म्हणाले, जगातील मोठ्या अर्थव्यवस्था स्वतःला वाचविण्याचे प्रयत्न करीत होत्या. त्यावेळी आपण सुधारणा करत होतो. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना आपण उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना सुरु केली. त्यातून भारताला नव्या संधी मिळवून देण्याचा उद्देश आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीही लागू करण्यात आलेली आहे. या योजनेचा वस्त्रोद्योग क्षेत्र व सुरत सारख्या शहरांना मोठा फायदा होणार आहे.
उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना ही दहा महत्वाच्या क्षेत्रांसाठी आहे. कोरोना महामारीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा व्हावी,असा उद्देश यामागे आहे. आपण स्वतःला २१ व्या शतकामधील जागतिक अर्थव्यवस्थेचे नेते म्हणून पाहिले पाहिजे. भारताकडे संधीची कमतरता नाही असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.