मुंबई:
कोव्हिड काळात वर्क फ्राॅम होम ही काळाची गरज आहे. मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत आहात, अशा शब्दात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.
मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असतानाही भाजपाकडून ही जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, जन आशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. या काळात जन आशीर्वाद यात्रेची काहीच गरज नसताना, भाजपाकडून ही यात्रा काढली जात आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे संकट वाढणार आहे. भाजपाचे मंत्री ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही, तुम्ही किमान संयम पाळा, असे आवाहन करत राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव घेता या यात्रेवरून निशाणा साधला आहे.
‘टॉप फाईव्ह’ मध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही!
एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांचा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाला आहे. मात्र यात एकाही भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश नसल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे. टॉप फाईव्ह मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आले आहे, ही मोठी बाब आहे. महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी काय केले, यावर विरोधकांनी यापूर्वी अनेकदा गाजावाजा केला, ढोल बडवले मात्र कामाची दखल घेतली गेली नाही. मुख्यमंत्री काम करत नाही घरी बसतात अशी टीका केली, पण कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद संपूर्ण जगाने, देशानं घेतली असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले की, जो पोल आहे तो एका प्रतिष्ठित संस्थेचा पोल आहे आणि त्यांनी दिलेल्या या पोलमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा नाव नाहीये.