पुणे
राज्यात कोणत्याही मुद्द्यावरून आंदोलन करण्यासाठी काहीजण बारामतीत येऊन आंदोलन करतात. कारण आपल्या आंदोलनाचा संदेश पवारसाहेबांपर्यंत पोहोचेल आणि त्यावर योग्य ते निर्णय घेतील, हाच विश्वास आंदोलकांना असतो.अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडताना पोलीस बळाचा व कंटेनरचा वापर कधीही केला गेला नाही. अशा शब्दात त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या रखडलेल्या प्रश्नावर खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत आमदार रोहित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकवेळा विनंती केली. मग सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्यकारक आहे.जर आग्रह करणे हे अपेक्षित आहे तर आपण खूप आग्रह करू शकतो. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊ नये यासाठी प्रवेशद्वारासमोर प्रथमच उभारलेली कंटेनरची भिंत हे मुळात चुकीचे आहे. उलट पंतप्रधानांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी वेळ द्यावा,त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. केंद्रसरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नाही. आंदोलक शेतकऱ्यांना घाबरते कि काय ? असा चुकीचा संदेश कंटेनर उभारल्यामुळे जात आहे. महाराष्ट्रात कोणत्याही एखाद्या मुद्द्यावरून काहीजण थेट बारामतीत येऊन आंदोलन करत असतात. पवारसाहेब बारामतीत असो अथवा नाही,त्यांच्यापर्यंत आंदोलनाचा संदेश पोहोचून योग्य तो निर्णय होतो. असा विश्वास त्यामागे असतो. मात्र बारामतीत कधीही पोलीस बळाचा वापर अथवा कंटेनरचा वापर होत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला.