सोलापूर:
मुख्यमंत्र्यांनी विषयी माझ्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना आदर आहे. मात्र एका कार्यक्रमात गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास करण्यात आल्याचे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. तसेच जर माझ्या वक्तव्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास, मी दिलगिरी व्यक्त करतो. असेही त्यांनी नमूद केले.
सोलापूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे सोलापूर येथील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत पालकमंत्री भरणे यांनी ताबडतोब दिलगिरी व्यक्त करावी; अन्यथा घसरलेली जीभ काढू ,अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
काय होते वक्तव्य…
नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांना मुख्यमंत्री व्हा, असे म्हणत कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी भाषणात उत्तर देताना आनंद दादा, मला खूप काही मिळाले आहे. तुम्हाला काय द्यायचा आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या ,असे आवाहन केले. मात्र महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्र्यांना मरू दया, असे वादग्रस्त वक्तव्य पालकमंत्री भरणे यांनी केले होते.