मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha elections) सज्ज झालेल्या भाजपने अपेक्षित जागांचे लक्ष्य साधण्यासाठी ‘फोडफोडी’ चे राजकारण सुरु केले आहे तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाला जेरीस आणून सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीद्वारे (I.N.D.I.A) एकीची मोट बांधली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi )यांच्या भारत जोडो (BHARAT JODO YATRA) यात्रेमुळे तळागाळातील मतदारांमध्ये झालेली वातावरण निर्मिती पाहता आता महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या ( I.N.D.I.A Alliance) बैठकीतून विरोधकांना ‘टीआरपी’ मिळू नये यासाठी होणाऱ्या वातावरण निर्मितीवर ‘पाणी’ कसे फिरवता येईल यासाठी एकनाथ शिंदे गटासह भाजपने व्यूहरचना ( BJP’s strategy) आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी इंडिया विरोधकांच्या आघाडीची दोन दिवसांची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील पवार गट सारी मदत करीत आहे. दोन दिवसांच्या बैठकीच्या तयारीसाठी सध्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या माध्यमातून मुंबई व राज्यात वातावरणनिर्मिती करण्याचा शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचा प्रयत्न आहे.
या दोन दिवस होणाऱ्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या काळातच इंडियाच्या घटक पक्षांना मोठा धक्का देण्याची व्यूहरचना सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपने आखली आहे. इंडियाच्या बैठकीवर सारा झोत राहू नये या उद्देशानेच ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.त्यासाठी वर्षा बंगल्यावर सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर खल करण्यात आल्याची चर्चा आहे. इंडिया आघाडीच्या बैठकी दरम्यान विरोधी आघाडीतील एखादा मोठा नेता गळाला लावला जाणार की अन्य कोणावर कारवाई होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (I.N.D.I.A: India Aghadi meeting in Mumbai; But also BJP’s strategy!)