नागपूर।
एमआयएमने (MIM) जरूर राष्ट्रवादीसोबत जावे, कारण ते सगळे शेवटी एकच आहे. भाजपला हरवण्यासाठी सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान मोदींवर विश्वास असल्याने ते भाजपलाच निवडून देतील, असाही विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
फडणवीस हे नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचा पराभव करण्याचा हा प्रयत्न आहे. जनता भाजपलाच निवडून देईल. युतीत शिवसेना काय करणार, हे पाहणे महत्वाचे राहील. सत्तेकरीता शिवसेना काय करते ते आम्ही पाहत आहोत. तसेही शिवसेनेने आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे, हे स्वीकारले आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नवाब मलिक यांना बिनखात्याचे मंत्री केले आहे. संविधानिक पदावर असलेली व्यक्ती जेलमध्ये असताना पदावर राहणे हे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राजू शेट्टी यांच्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. मुळातच राजू शेट्टी भाजपसोबत होते, पण काही कारणाने ते पलीकडे निघून गेले. कोण आमच्यासोबत येणार, कोण नाही, हे प्रत्यक्ष कळल्या शिवाय त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मात्र, जे कोणी शेतकरी नेते असतील त्यांनी जर मागच्या काळात मागे वळून पाहिले, तर सर्वाधिक काम शेतकर्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले आहे. तसेच, साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने जे निर्णय घेतले तेवढे कोणीच करू शकले नाही.