सातारा।गेली काही दिवस छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना आता पुन्हा एक वादग्रस्त विधान मंत्री मंगलप्रभात लोढा (Controversial statement of Mangalprabhat Lodha)यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये किल्ल्यात बंद करुन ठेवले होते. त्यावेळी शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी जसे तिथून बाहेर आले, तसे एकनाथ शिंदेंना बाहेर पडू न देण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर आले असे म्हणत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली आहे. लोढा यांनी म्हटले आहे की,शिवराय आग्रातून बाहेर पडले तसे शिंदे बाहेर पडले, औरंगजेबाने जसे शिवरायांना थांबवले तसे शिंदेंनाही कुणीतरी रोखले असे म्हणताना शिवाजी महाराज स्वराज्यासाठी बाहेर पडले तसे एकनाथ शिंदे हे बाहेर पडले असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे दुर्दैवी वक्तव्य आहे, तसे लोढा आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही, त्यांच्याकडे पर्यटन खाते असले तरी एवढी त्यांची बुद्धीमत्ता नाही अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. शिवाजी महाराजांनी गद्दारी केली नव्हती, ते स्वराज्य वाचविण्यासाठी महाराजांचे नियोजन कौशल्य होते. राज्यपालांनी ज्या पद्धतीने शिवरायाचा अपमान केला तसेच हे वक्तव्य आहे, यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ज्यांना महाराष्ट्र गद्दार समजतो, खोकेबाज समजतो, त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे पूर्वनियोजीत आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम शिंदे सरकारकडून सुरू आहे. त्यानुसारच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य केले आहे. मंत्री लोढांचे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. केवळ शिवरायच नव्हे तर महाराष्ट्राचाही अपमान आहे.अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.