नवी दिल्ली| निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (election strategist Prashant Kishor)यांना काँग्रेसमध्ये (CONGRESS)सहभागी करून घेण्याबद्दल पक्षनेत्यांमध्ये साशंकता आहे, मात्र, आम्ही मोकळ्या मनाचे आहोत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी स्पष्ट केले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (BJP) सामना करण्यासाठी किशोर यांनी सुचवलेला नियोजनाचा आराखडा प्रभावी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांच्या विश्वासू नेत्यांमध्ये दिग्विजय सिंग यांची गणना होते. कॉंग्रेससाठी किशोर यांनी सुचवलेल्या ‘रोडमॅप’वर विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्येही त्यांचा समावेश आहे.
प्रशांत किशोर हे आकडेवारीच्या विश्लेषणावर मार्गक्रमण करणारे विश्लेषक आहेत. ही पद्धत काही फारशी नवी नाही. त्याबद्दल आम्हाला माहिती आहे. त्यांना पक्षात घेण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे. मात्र त्यांना किती महत्व द्यायचे, किती प्रमाणात आणि कशासाठी द्यायचे, एवढाच मुद्दा आहे, असे दिग्विजय सिंग यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
प्रशांत किशोर यांचे सादरीकरण खूप चांगले
प्रशांत किशोर यांना पक्षात घेऊन त्यांना पक्ष संघटनेत बदल करण्यास सक्षम अधिकार असलेले पद देण्यास आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांपैकी दिग्विजय सिंग हे एक आहेत.
आपला प्रशांत किशोर यांच्याशी फारसा जवळचा संबंध नव्हता. संवादही नव्हता. ते राजकीय विश्लेषक आहेत आणि त्यांनी काँग्रेसला एक रोडमॅप सुचवला आहे. पण त्यानंतर त्यांचा प्रवास एका पक्षातून दुसऱ्या पक्षापर्यंत झाला आहे. त्यामुळे त्यांची राजकीय किंवा वैचारिक बांधिलकी स्पष्ट नव्हती. मात्र, आता ते काही ठोस सूचना घेऊन पुढे आले आहेत आणि त्यांचे सादरीकरण खूप चांगले आहे, (The planning plan suggested by Prashant Kishor is effective) असे सिंग यांनी नमूद केले.
प्रशांत किशोर यांनी यापूर्वी सन २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळालेल्या भरघोस यशात योगदान दिले आहे. ते प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस तर आंध्र प्रदेशात द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचेही काम करीत आहेत. याकडे सिंग यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, एकीकडे त्यांची I-PAC ही संस्था आहे आणि दुसर्या बाजूला त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व आहे. किशोर यांना पक्षात सामावून घ्यायचे की नाही याचा निर्णय पूर्णपणे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा असेल, असे सिंह यांनी सांगितले.
… १९६९ पासून नेहरू-गांधी कुटुंबाला पाठिंबा
पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याबाहेरच्या नेत्याच्या हातात द्यावे, ही मागणी जोर धरत असल्याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, या बाबत पक्षाने निर्णय घ्यायचा आहे. या विषयावर आपले स्वतःचे म्हणून काही एक मत आहे. मात्र, आपण ते माध्यमांमध्ये व्यक्त करू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोणीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. मात्र, बहुसंख्य काँग्रेसजनांनी सन १९६९ पासून नेहरू-गांधी कुटुंबाला पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले.
पक्षाचे नेतृत्व करण्यात राहुल गांधी (Rahul Gandhi)सक्षम नसल्याचा आक्षेप घेतला जात असल्याकडे लक्ष वेधले असता सिंग म्हणाले की, काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते त्यांच्याकडे आहे. राहुल हे एक अत्यंत कर्तव्यदक्ष नेते आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी उभा असतानाही त्यांनी सन २०१९ मध्ये पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. मला पूर्ण खात्री आहे की त्यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची सर्व क्षमता आहे.