ठेकेदार -अधिकाऱ्यांवर कारवाई करा;अन्यथा पालिकेत अनोखे आंदोलन
पुणे|
आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले असताना, पुणेकरांना शहरातील रस्त्यावरून जाताना ‘मरणयातना’ सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वी आंदोलन करून सत्ताधारी भाजपला जाब विचारण्यात आला;पण पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती कायम असल्याने आता काँग्रेसने रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करा ;अन्यथा आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील महत्वाच्या वर्दळीच्या रस्त्यांची पाहणी करून त्याच्या सद्यस्थितीचा अहवाल काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी तयार केला आहे. त्यात या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे,सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्षच नसल्याची गंभीर बाब आढळली आहे.तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही खबरदारी न घेता ठेकेदारांचे काम निष्काळजीपणे सुरु आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ते छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता,टिळक रस्ता या रस्त्यांवर ड्रेनेज लाईन,स्मार्ट सिटी अंतर्गत चौक सुशोभिकरण,24×7 पाणीपुरवठा या विभागांची कामे सुरु आहेत. मात्र त्यासाठी रस्त्यांची झालेली खोदाई, काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ते पूर्ववत न करता रस्त्याच्या कडेला राडारोडा,खाचखळग्यांचे रस्त्याला आलेले स्वरूप यामुळे नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार याला जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी केला आहे.
याबाबत बालगुडे यांनी महापालिका आयुक्तांना रस्त्यांच्या सद्यस्थितीबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहेत कि, गेले अनेक महिन्यांपासून या विभागांच्या प्रमुखांना अनेक वेळा निवेदन देऊन झाले आहे. विहित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार वर्गावर कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा त्यांच्याकडून कामे करवून घेताना हे अधिकारी दिसत नाही.तसेच पुणे महानगरपालिकेने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करताना हे ठेकेदारही दिसत नाही. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे त्यांच्या चुका दाखवून सुद्धा आजमितीस कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. पुणे महानगरपालिकेचे ड्रेनेज,पाणीपु रवठा, पथ या खात्यांचे प्रमुख पुणेकरांच्या जीवाशी स्पष्टपणे खेळत आहेत. अनेक रस्त्यांवर झालेला राडारोडा, खड्डे यांचे निवारण कुठेही झाल्याचे दिसून येत नाही. नागरिकांना पुणे शहरातील रस्त्यावरून जाताना अक्षरशः जीव मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने शहरातील रस्ते सुस्थितीत न केल्यास तसेच संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास पालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार येईल, असा इशाराही ऋषिकेश बालगुडे यांनी दिला आहे.