अमरावती|येत्या ३० डिसेंबरपर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील सुमारे ४० भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पोलखोल करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावतीत सांगितले.
एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणणाऱ्या सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळ ‘ रडार’ वर कायम असल्याचे अधोरेखित केले आहे.
त्रिपुराच्या घटनेनंतर राज्यातील तीन शहरांमध्ये मोर्चा निघतो. या मोर्चादरम्यान दगडफेक आणि हिंसाचार घडतो. या घटनेच्या निषेधार्थ जी काही प्रतिक्रिया उमटली. त्यासाठी भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, जे काही घडले त्याचा हिशेबही सरकारला द्यावा लागणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात अनेक मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत. कॅबिनेट मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. सध्या या सरकारचे २८ घोटाळे माझ्याकडे असून ३० डिसेंबरपर्यंत ४० भ्रष्टाचाराची पोल-खोल मी करणार असल्याचे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यातील भ्रष्टाचार उघड करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले.





