मुंबई। तत्कालीन मविआ सरकारमधील अर्थमंत्री अजित पवारांवर ( Ajit Pawar)गंभीर आरोप करत शिवसेनेतील शिंदे गटाने बंडखोरी केली. मात्र, आता त्यांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले त्याच अजित पवार यांच्याबरोबर सत्तेचे वाटप करावे लागत आहे.विशेष म्हणजे एकप्रकारे तडजोड करावी लागणार आहेत. त्यातच अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर बोलताना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachu Kadu)यांनी अजित पवारांना मिळणारे मंत्रीपद आणि आमदारांची नाराजी यावर प्रतिक्रिया देताना भीतीही व्यक्त केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, खातेवाटपामध्ये काही गोष्टींमध्ये ‘किंतू परंतू’ असू शकतो. प्रत्येकाला वाटते की, अजित पवारांकडे अर्थखाते जायला नको. मागच्यावेळी अजित पवारांनी जो कारनामा केला, तर ते यावेळी होऊ नये अशी अपेक्षा आहे. तसे पुन्हा यावेळी होईल की काय अशी आमदारांना भीती आहे.
प्रत्येक आमदाराला असे वाटते आणि त्यातील चार-पाच आमदार मलाही म्हणाले की, अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खातं दिलं गेलं, तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे, इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील. म्हणून सर्वांना वाटतं की, अर्थखातं अजित पवारांना देऊ नये, असा दावा बच्चू कडूंनी केला.आमदारांची नाराजी दूर करणं हे सरकारपुढे मोठं आव्हान आहे. कारण तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदं गेली आहेत. त्यामुळे आधीच अपेक्षा असलेल्यांना वाटतं की, आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथं आला. त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी असणारच आहे, असंही बच्चू कडूंनी नमुद केलं आहे.(Bachu Kadu: MLAs are facing ‘this’ fear due to Ajit Pawar!)