पुणे :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यातील विधान भवन येथे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर राज्यपाल उपस्थित अधिकारी आणि नेत्यांना भेटण्यासाठी गेले.
त्यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न विचारला. तेव्हा राज्यपालांनी ‘राज्यसरकार आग्रह धरत नाहीत मग तुम्ही का धरता ?’ अशा शब्दात काँग्रेस नेत्यांना सुनावले.शिवाय आता राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे असेही स्पष्ट केले.
झेंडावंदन पार पडल्यानंतर राज्यपाल उपस्थित नागरिकांना भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील होते. राज्यपाल हे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्याजवळ पोहोचल्यानंतर 12 सदस्यांची नियुक्ती करा, असे विचारत या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती रणपिसे यांनी केली. त्यावर राज्यपालांनी आपल्या खास शैलीत रणपिसे यांना उत्तर दिले. अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत. याबाबत राज्य सरकार आग्रह धरत नाही, मग तुम्ही का धरता? याबाबतीत राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे’ अशा शब्दात राज्यपालांनी रणपिसे यांना सुनावले.