मुंबई।कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला जाहीर झालेला अनुवादाचा पुरस्कार रद्द केल्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राज्य सरकारचा साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप निषेधार्ह आहे. आणीबाणीच्या काळात असा प्रकार झाला होता. त्याच पद्धतीने राज्यात आता अघोषित आणीबाणी (unannounced emergency)लादण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून (Shinde government’s) केला जात आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले, राज्य सरकारने आता तर कहरच केला आहे ६ डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारने उत्कृष्ट साहित्यासाठी पुरस्कार जाहीर केले. मात्र, नंतर १२ डिसेंबरला कोबाड गांधी यांच्या अनुवादित पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला. यासाठी पडद्यामागे बऱ्याच घटना घडल्या. यासंदर्भात १२ डिसेंबरला शासन आदेश जारी करण्यात आला. या पुरस्कारांसाठी शासनानेच तज्ज्ञांची निवड समिती स्थापन केली होती. मात्र, ही समितीही बरखास्त केली.
महाराष्ट्रात साहित्य, कला, संस्कृतींचा नेहमीच आदर, मान ठेवला जातो. अशात अनघा लेले यांना जाहीर झालेला अनुवादाचा पुरस्कार रद्द करणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून राज्यकर्त्यांनी कधीही साहित्यात हस्तक्षेप केला नाही. यासंदर्भात जाणकारांनीच निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा असते. आणीबाणीच्या काळात राज्यकर्त्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची किंमतही राज्यकर्त्यांनी मोजली. आता देखील शिंदे-फडणवीस सरकारकडून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतोय.असेही अजित पवार म्हणाले.
बेरोजगारी, महागाईवरून जनतेचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न
शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन किमान सहा महिने झाले आहेत. कोणतेही नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर ते सर्वप्रथम विकास योजना राबवणे, राज्यात शांतता प्रस्थापित करणे तसेच, लोकाभिमूख सरकार देण्याचा प्रयत्न करते. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून आजपर्यंत सातत्याने वाद निर्माण केले जात आहे. रोज नवनवीन वाद निर्माण करून बेरोजगारी, महागाई अशा महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न होत आहे.(Ajit Pawar: Shinde government’s attempt to impose unannounced emergency in the state)