पुणे ।आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून (Kasba assembly elections) माघार घेतली आहे.
आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत अशी माहिती आम आदमी पक्षातर्फे देण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयामुळे आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी दिली आहे.
दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उत्तम व भ्रष्टाचार रहित प्रशासकीय सेवा यांचे विकासाचे मॉडेल लोकांना मनापासून आवडले आहे. पंजाबमध्ये देखील याच मॉडेलच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या सरकारचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये लवकरच येतील आणि याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून होईल.असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे. आपने सांगितले की, महाराष्ट्रातील खोक्या-बोक्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळलेली आहे. मागच्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची संगीत खुर्ची राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे.
कोणताही प्रस्थापित पक्ष कोणत्याही इतर प्रस्थापित पक्षासोबत सत्ता स्थापन करू शकतो. कोणतीही वैचारिक भूमिका नाही, हे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. आमदारांनी राजकीय पक्ष बदलण्यासाठी अथवा सत्तेत भागीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याच्या चर्चा जन सामान्यांमध्ये दररोज घडत आहेत. लोक या प्रकाराला कंटाळले आहेत.(Aam Aadmi Party: Out of by-elections; But Kejriwal will come to Maharashtra)