पुणे| आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation elections)निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्या परिवर्तन रॅलीमुळे ( transformation rally) सुस्तावलेल्या शहर काँग्रेसला (Congress) मात्र आता एनर्जीचा बूस्टर डोस मिळाला आहे. बऱ्याच वर्षानंतर रॅलीच्या निमित्ताने शहर काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली मुसंडी मारली .त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जागा वाटपातील गोंधळ टाळण्यासाठी ;तसेच पक्ष विस्तारासाठी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली आणि हे यश मिळाले आहे. असे समर्थन स्वबळाच्या निर्णयाबद्दल केले होते. त्यामुळे आगामी पालिका निवडणुका स्वबळावरच लढविण्याची यापूर्वी केलेली घोषणा आता अंमलात आली आहे.
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षात हालचालींना वेग आला आहे. त्यात प्रारंभीपासून स्वबळाचा नारा देणाऱ्या प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेला शहर काँग्रेसमधील स्थानिक नेतृत्वांकडून नकाराची घंटा दर्शविण्यात येत होती.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची भुमिका या स्थानिक नेत्यांची होती. मात्र त्यामुळे आधीच मरणासन्न अवस्थेपर्यंत पोहोचल्या शहर काँग्रेसला गतवैभव कसे प्राप्त होईल असा सरळ सवाल निष्ठावंत काँग्रेसजनीचा होता.
एकमेकांपुरतेच पाहण्याच्या वृत्तीने पक्षाचे नुकसान होत असल्याकडे कार्यकर्त्यांकडून लक्ष वेधण्यात येत होते. प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वी शहरात कार्यकर्त्यांच्या थेट भेटीगाठी घेतल्या होत्या, त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणी मांडल्या होत्या. त्यावेळी लवकरच बदल दिसेल असे आश्वासन पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिले होते आणि कार्यकर्त्यांची ताकद वाढली तरच पक्ष वाढेल हा ठाम विश्वास दर्शवून जोमाने काम करण्याच्या सूचनाही केल्या होत्या तसेच स्थानिक नेतृत्वांची कानउघडणीही केली होती.निवडणुकीत किती जागा येतील यापेक्षा पक्ष कसा पुन्हा बळकट होईल या नाना पटोले यांच्या धोरणाची अंमलबजावणी परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून दिसून आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांना कोणतीही बाब असू द्या, पक्षाच्या हितासाठी तत्परतेने मला कळवा या सूत्रामुळे कार्यकर्त्याना आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळेच एरवी नावापुरत्या आंदोलनातून दिसणारी काँग्रेस मात्र परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून रस्त्यावर दिसल्याने राजकीय वर्तुळात त्याचीच चर्चा जोरात रंगत आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या सहभागात निघालेल्या या परिवर्तन रॅलीमुळे काँग्रेसला पुन्हा गतवैभवाकडे मार्गक्रमण निश्चित करता येईल असा सूरही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडून आळवला जात आहे. त्यात कालपर्यंत उमेदवार कसे आणायचे या पेचात अडकलेल्या शहर काँग्रेसची उमेद मात्र या रॅलीमुळे वाढली आहे.
भाजप – राष्ट्रवादीच्या लढाईत ‘ बेरजेचे समीकरण ‘ आयतेच सुकर होणार असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होणार असल्याने मरगळ झटकून आता कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उमेदवारी वाटपात स्वतः लक्ष घालणार असल्याने ;तसेच कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी मिळालीच पाहिजे हे त्यांचे धोरण असल्याने स्थानिक नेत्यांच्या राजकारणाकडे कानाडोळा करून आता कार्यकर्त्यांनी परिवर्तनाचा निर्धार केला आहे. त्याची सुरुवात स्थानिक नेत्यांची गटबाजी संपवून होणार असल्याची जोरदार चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. परिणामी निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही पदाधिकारी पक्षांतराचे हत्यार उपसून वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चाही पक्षाच्या वर्तुळात होत असली तरी प्रदेशाध्यक्षांनी पक्ष बळकटीकरणाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ज्या – ज्या कार्यकर्त्यांच्या शक्तीवर वर्चस्व गाजवले, त्या – त्या कार्यकर्त्यांना पक्षाने थेट आपल्या विरोधात उभे केले तर या धास्तीने पर्यायाने ‘ परिवर्तन’ आपल्यापासूनच तर नाही ना! यामुळे काही पदाधिकारी चिंताग्रस्त बनले आहेत.