मुंबई।
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन चौपाल रॅलीसाठी बिजनौर येथे प्रत्यक्ष जाणार होते. तेथून ते प्रचार सुरू करणार होते;पण पंतप्रधान मोदींचा बिजनौर दौरा खराब हवामानुळे रद्द झाला. आता ते व्हर्चुअली संवाद साधत आहेत. दरम्यान,आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून यावरून टीकाटिपण्णी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी (Nawab Malik targets Narendra Modi )यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
बिजनौर येथे निवडणूक प्रचारसभेसाठी पंतप्रधान मोदी जाणार होते. त्यांनी खराब हवामानाचे कारण सांगत दौरा रद्द केला. खरंतर दिल्लीपासून बिजनौरपर्यंत सूर्य निघालेला आहे. कदाचित ते निवडणुकीच्या वातावरणाबद्दल बोलत असतील, असे नवाब मलिक यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.दरम्यान, पंतप्रधान मोदी बिजनौरला प्रत्यक्ष जाता न आपल्या ऑनलाईन भाषणात बोलताना म्हणाले की, सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो, कारण निवडणूक आयोगाकडून काहीशी मुभा मिळाल्यामुळे मी बिजनौरमधून निवडणूक प्रचार सुरू करावा, असा विचार करत होतो, पण खराब हवामानामुळे माझे हेलिकॉप्टर निघू शकले नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमच्याशी ऑनलाईन माध्यमातून भेटत आहे.
सूर्यप्रकाश बहरत आहे, पण भाजपचे हवामान खराब
दुसरीकडे राष्ट्रीय लोकदलाचे ( National Lok Dal leader) नेते जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. ट्वीटद्वारे त्यांनी म्हटले आहे की, बिजनौरमध्ये सूर्यप्रकाश बहरत आहे, पण भाजपचे हवामान खराब आहे.