मुंबई । लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम आता वाजायला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपने (BJP) विरोधी पक्षांना खिंडीत गाठण्यासाठी ‘ बेरजेचे समीकरण’ सुरु केले आहे. आधी शिवसेनेत(SHIVSENA) फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीलाही (NCP) खिंडार पाडून भाजपने मतांची फाटाफूट केली असून एकप्रकारे महाराष्ट्रातून( Maharashtra) प्रादेशिक पक्ष मुक्त राज्यांचा शुभारंभ केला आहे. असे असले तरी देशातील विविध संस्थांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Elections 2024 Survey) निकालाचा अंदाज बांधणारे सर्व्हे (Survey) समोर आले आहेत आणि त्यात महाराष्ट्रात ( Maharashtra) इंडिया आघाडीच्या पारड्यात महायुती पेक्षा अधिक जागा दाखविल्याने निवडणुकीआधीच इंडिया आघाडी सरस ठरली असली तरी निवडणुकीनंतर खरे चित्र समोर येणार आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी २६ जागांवर इंडिया आघाडी मुसंडी मारेल, असे सांगण्यात आले आहे.
इंडिया टुडेचा ‘द मूड ऑफ द नेशन्स फेब्रुवारी २०२४’ हा सर्व्हे सर्व लोकसभेतील ३५,८०१ प्रतिसादकर्त्यांच्या आधारावर आहे. हे सर्वेक्षण १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या काळात झाले आहे. इंडिया आघाडीला २६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत असताना भाजपा आणि एनडीए आघाडीला २२ जागा मिळू शकतील, असे भाकीत त्यात वर्तविण्यात आले आहे.त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास काँग्रेस पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचा दावा सर्व्हेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला १२ जागा मिळतील, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मागच्या दोन निवडणुकात काँग्रेसची कामगिरी निराशाजनक होती. २०१४ साली काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. तर २०१९ साली बाळू धानोरकर यांच्या रुपाने केवळ एक जागा काँग्रेसला मिळाली होती.
शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांना एकत्रित १४ जागा मिळतील असेही सर्व्हेच्या आधाराने सांगण्यात आले. मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली असता इंडिया आघाडीला ४५ टक्के तर एनडीएला ४० टक्के मतदान मिळेल असे भाकीत वर्तविले आहे. तर टाइम्स नाऊ मॅट्रीज या वृत्तसंस्थेचाही सर्व्हे समोर आला आहे. त्यामध्ये एनडीएला ३९ तर इंडिया आघाडीला केवळ ९ जागा मिळतील, असा अंदाज अंदाज वर्तविण्यात आला आहे.
लोकांची मानसिकता मोदींना पाठिंबा: देवेन्द्र फडणवीस
दरम्यान मॅट्रीजच्या सर्व्हेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, सर्व्हे काहीही आले तरी लोकांची मानसिकता मोदींना पाठिंबा देण्याची बनली आहे. लोकांनी ठरवलं आहे की, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं. त्यामुळे मोदीजी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाला जनता निवडून देईल. गतवेळेपेक्षा आमच्या अधिक जागा निवडून येतील.असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.