Raj Thackeray:’त्या’ पोस्टचा रोख   पीएम मोदींवर !

मुंबई ।महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) लक्ष्य केले आहे. टिळकांच्या पुण्यतिथी दिनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या दोन्ही गोष्टींचा धागा जोडत राज ठाकरे यांनी टिळकांना अभिवादन करणारी एक सणसणीत ट्विटरवर  पोस्ट (Post on Twitter) लिहिली मात्र  राज ठाकरेंनी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नामोल्लेख केलेला नसला तरी सद्यस्थितीत सुरु असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर  नरेंद्र मोदींकडे रोख असल्याचे  पोस्टमधील मजकूरातून स्पष्ट होत आहे. 
लोकमान्य टिळकांना अभिवादन करणारी पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिली आहे. या पोस्ट राज ठाकरेंनी सद्यस्थितीतील राजकारणावर भाष्य करताना अप्रत्यक्ष  थेट मोदींवर हल्ला चढवला आहे.
राज ठाकरेंच्या सणसणीत पोस्टमध्ये काय?https://twitter.com/RajThackeray/status/1686235798344179712
राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, “आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन ठळक कालखंड ठरवायचे झाले तर अर्थात पहिलं, ‘टिळक युग’ आणि दुसरं ‘गांधी युग’ असं करता येईल. 1900 ते 1920 ह्या संपूर्ण कालखंडावर टिळकांचा एकूणच भारतीय सार्वजनिक जीवनावर जो पगडा होता त्याची तुलना होणे शक्यच नाही. असं म्हणतात की एकदा टिळक कलकत्त्याला जायला निघाले, तर त्या प्रवासाला जवळपास 11 दिवस लागले कारण इतक्या मोठ्या संख्येने वाटेतल्या प्रत्येक शहरांत टिळकांचं दर्शन घ्यायला, त्यांना भेटायला लोकांची गर्दी जमत होती. तेव्हा खंडप्राय भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आणि मान्यता मिळवलेला हा बहुदा एकमेव मराठी नेता”, असा किस्सा राज ठाकरेंनी पोस्टमध्ये सांगितला.
केंद्राकडून  वाढत्या हस्तक्षेपाचा मुद्दा अधोरेखित
राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून राज्यातील सरकारांच्या अधिकारातील वाढत्या हस्तक्षेपाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. ते म्हणतात, “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे….’ असं म्हणणाऱ्या टिळकांच्या स्वराज्याबद्दलच्या कल्पना सुस्पष्ट होत्या. त्यांच्या केंद्रीय सत्तेबाबतच्या मांडणीत भाषिक प्रांतरचनेचं महत्व आणि संघराज्यांना संपूर्ण स्वायत्तता ह्या बाबींना मध्यवर्ती स्थान होते. लोकमान्यांच्या ह्या विचाराचं स्मरण, पुरस्काररुपी आशीर्वाद मिळणाऱ्यांना असेल असं मी मानतो”, असे खडेबोल राज ठाकरेंनी मोदींना उल्लेख न करता सुनावले आहेत.
समोरच्याचं संपूर्ण चारित्र्यहनन … 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढे म्हणतात, “लोकमान्य टिळकांचे समकालीन नेत्यांशी तात्विक मतभेद होते पण त्यांनी ते मतभेद राष्ट्रहिताच्या आड येऊ दिले नाहीत. तसेच मतभेद आहेत म्हणून समोरच्याचं संपूर्ण चारित्र्यहनन करणं हे त्यांच्या कधीही ध्यानीमनी नव्हते. महात्मा गांधीजींचे आणि त्यांचे तात्विक मतभेद झाले पण त्यांनाही टिळकांबद्दल नितांत आदर होता आणि आपल्याला त्या पार्श्वभूमीवरच पुढे जायचं आहे ह्याचं भान होतं. तसंच टिळकांना देखील उद्याच्या भारतात गांधी हे राष्ट्रनेते ठरू शकतील ह्याची जाणीव होती आणि त्यासाठी टिळकांनी गांधीजींशी कोणतेही वैचारिक मतभेद सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ दिले नाहीत. आज महापुरुषांच्या चारित्र्यहननाच्या काळात टिळकांचा ह्या विचाराला पुन्हा उजाळा मिळायला हवा.”

सद्य परिस्थितीत, ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’… 

राज ठाकरेंनी म्हटलंय की, “रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं असा आग्रह टिळकांनी धरला होता, ह्यातून राजकारणात फक्त राजकीय आदर्श पुढे येण्याऐवजी प्रतिभाशक्तीचा आदर्श पण यावा असा आग्रह धरणारे टिळक हे खऱ्या अर्थाने द्रष्टे म्हणावे लागतील, ते ह्यासाठी की सद्य परिस्थितीत, ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’चे आदर्श उभे राहात असताना, प्रतिभा आणि संस्कृती किती महत्वाची आहे ह्याची जाणीव त्यांना होती. ह्या लोकमान्य कर्मयोग्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन.” Raj Thackeray: The blame for ‘that’ post is on PM Modi!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *