नाशिक। आगामी विधानसभा निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’ (Mahavikas Aghadi) राहते की नाही? तसेच निवडणूक लढवण्याचा तिन्ही पक्षाचा वेगवेगळा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्यांची फक्त गंमत पाहतोय. राज्यात लवकरच काँग्रेस व राष्ट्रवादीची (Congress and NCP) अवस्था शिवसेनेसारखी (Shiv Sena) होईल, त्याची सुरुवात काँग्रेसमध्ये दोन गट पडून झाली असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
नाशिकमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीच्या निमित्ताने महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते. कारण, काँग्रेसमध्ये आत्ताच दोन गट पडले आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात एक गट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसला कंटाळले आहेत.
राज्यातील महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजले असून कोण केव्हा बाहेर पडेल हे सांगता येत नाही ‘महाविकास आघाडी’मधील काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होईल असे भाकित महाजन यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीमधील १० ते २० आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असे विधान शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांनी केले होते. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, आता राज्यात काहीही होऊ शकते, लोकं आता काँग्रेसला कंटाळले आहेत. शिवसेनेत दहा-बारा आमदार राहिलेत, महाविकास आघाडीचे तीनतेरा वाजले आहेत. या तिन्ही पक्षातून कोण केव्हा बाहेर पडेल हे काहीही सांगता येणार नाही.(Girish Mahajan: Soon Congress and NCP will be like Shiv Sena!)