कोल्हापूर
कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी आणि पोल्ट्रीधारक यांना खड्याप्रमाणे बाजूला केले आहे. 13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत करण्याचा जीआर राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. ज्यांना शेती कळत नाही,त्यांनी मदत केली मात्र ज्यांना शेती कळते , त्यांनी मदत देण्यास टाळाटाळ केली. असा टोला माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. दरम्यान विविध मागण्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी
महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला अनेक कारणे आहेत. राज्य सरकारने दरवर्षी मदत जाहीर करण्यापेक्षा त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत . दोन राज्यांच्या वादात शेतकऱ्यांचे बळी का? असा सवाल आम्ही कर्नाटक राज्याला देखील करणार आहोत. महापुराच्या नुकसानीतून सावरण्यासाठी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहील, असे वाटले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ आश्वासन देण्यापलीकडे काहीही केले नाही. १३ मे 2015 च्या शासन निर्णयानुसार यंदाच्या महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे जाहीर केले. खरीप पिकांना 68 रुपये प्रति गुंठा आणि ऊसाला 135 रुपये नुकसानभरपाई देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे, ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, याकडेही राजू शेट्टी यांनी लक्ष वेधले.
