अहमदनगर।पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार,लालू प्रसाद यादव,ममता बॅनर्जी आदी असे कोणाचेही चेहरे आणण्याचा अधिकार विरोधकांना आहे. मात्र, पंतप्रधानपद मिळणे सोपे काम नाही. एनडीएसमोर कोणाला संधी मिळेल असे वाटत नाही. भाजप मित्रपक्षांना संपविते या आरोपात तथ्य नाही. उलट मित्रपक्षच भाजपला धोका देत आहेत. हे नितीश कुमारांच्या उदाहरणावरून दिसून येते. भाजप कधीही म्हणत नाही की, हे सरकार भाजपचे आहे. भाजपचे नेते (BJP) हे एनडीएचे सरकार असल्याचेच सांगतात,अशी थेट भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी मांडली.
रामदास आठवले हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी लोकसभा मतदार संघातून२००९ साली केंद्रीय मंत्री रामदास आठवले पराभूत झाले होते. मात्र, आता पुन्हा त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिर्डीतून लोकसभा लढविण्याची माझी इच्छा आहे. जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भाजप व शिंदे गटाची मागणी आणि निवडून येण्याचे वातावरण असेल तर मी शिर्डीतून निवडणूक लढेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. विधानसभेसमोर विरोधी पक्षातील आमदारांनी ५० खोके आणि बाकी सगळे ओके, अशा घोषणा दिल्या होत्या. यावर रामदास आठवले यांनी त्यांचे मत व्यक्त केले. आठवले म्हणाले की, घोषणा दिल्या जात आहेत की ५० खोके आणि बाकी सगळे ओके. मी म्हणतो मार तुम्ही छक्के. त्यामुळे ते किती जरी छक्के मारत असले तरी खोक्यात काही नाही आणि ओकेत काही अर्थ नाही. जे शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. ते शिवसेनेच्या निर्णयांना कंटाळून फुटले आहेत, असेही आठवले म्हणाले.
‘त्या’ आरोपात तथ्य नाही
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधल्यामुळे हे सर्व आमदार फुटले आहेत. त्यामुळे अशा आरोपात तथ्य नाही. त्यांनी कितीही आरोप केला तरी त्याला अर्थ नाही. शेवटी आमचेच सरकार राज्यात आले आहे. एकनाथ शिंदेंसह ४० आमदार शिवसेनेतून आणणे हे काही लहान मुलांचा खेळ नव्हता. शिवसेनेने ज्या पद्धतीने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. मात्र, तसे भाजपने केले नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला, असेही त्यांनी म्हटले आहे.
(Ramdas Athawale: Getting the post of Prime Minister is not an easy task)