पुणे ।राज्यात शिवसेनेला भगदाड पाडून बंडखोर एकनाथ शिंदे यांनी ४० सहकारी आमदारांसमवेत भाजपशी संधान साधून सत्ता स्थापन केली असली तरी एकनाथ शिंदे – देवेन्द्र फडणवीस सरकार कायदेशीर कि बेकायदेशीर हा वाद न्यायालयात पोहचला आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्ताराला अजूनही (Cabinet expansion delayed) मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे कामकाजाचा खोळंबा होत असल्याने कोंडीत अडकलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मंत्रीच नसल्याने सचिवांना अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्यावरून आता टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना द्यावे अशी मागणी करताना सगळेच काम सचिव करत असतील तर, मुख्यमंत्री कशाला पाहिजे असा रोखठोक सवालही केला आहे.
Ajit Pawar’s criticism of Eknath Shinde government: सगळेच काम सचिव करत असतील तर, मुख्यमंत्री कशाला पाहिजे ?
अजित पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. पक्षाच्या विविध कामासाठी तसेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात ते पुण्यात आले होते. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये (NCP office in Pune)अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. राज्यामधील विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्याकडे सुद्धा अनेक लोक कामे घेऊन येतात. परंतु या कामाचा पाठपुरावा कुठे करायचा असा प्रश्न आहे. अनेक अधिकाऱ्यांना मी बोलतो, पण मंत्री नसल्यामुळे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ होणं गरजेचे आहे. तसेच आम्ही राज्यपालांनाही भेटलो. त्यावेळीही हेच सांगितले की, लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे,असेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.
राज्यात अशी वेळ आजपर्यंत मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर कुठल्याही मुख्यमंत्र्यावर आली नाही. याकडे लक्ष वेधून अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ही वेळ आली हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
मंत्री नाही म्हणून राज्यातील काम थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना दिले आहेत. त्यामुळे सगळेच काम सचिव करत असतील तर, मुख्यमंत्री कशाला पाहिजे असा टोमणाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदेना लगावला. मुख्यमंत्र्यांनी सगळे अधिकार मुख्य सचिवांना देऊन घरी बसावे अशी उपरोधिक टीकाही यावेळी अजित पवार यांनी केली. राज्यात अनेक प्रश्न, समस्या आहेत. ते सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ असते. आता मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना दिले आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळाची राज्यात गरज नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.