नवी दिल्ली। महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. बंडखोर आमदारांना निलंबित करण्याच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ‘तुम्ही नवीन पक्ष बनवला नाही तर तुम्ही आहात कोण?’असा सवाल (Supreme Court questions Shinde group) शिंदे गटाला विचारला आहे.
अध्यक्षांची भुमिका संशयास्पद
शिवसेनेच्यावतीने सिंघवी यांनी स्पष्ट केले की, विधानसभा अध्यक्ष आमच्या तक्रारीवर लगेच निर्णय देत नाहीत;पण विरोधकांच्या तक्रारींवर लगेचच निर्णय घेतात. त्यांची भुमिका संशयास्पद आहे. शिंदे गटाने २१ जूनपासून पक्षविरोधी काम केले. सरकार चालवणे हाच शिंदे गटाचा हेतू नसून त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात आहे. निवडणूक आयोगाकडून गट वैध ठरवण्याचे प्रयत्न शिंदे गटाचे आहेत. बंडखोरांना विलिनीकरणाशिवाय कोणताही पर्याय नाही. केवळ बहुमतावर सर्व गोष्टी वैध ठरु शतत नाही. बहुमतावर दहाव्या सुचीचे नियम बदलु शकत नाही. दहाव्या सुचीचे नियम पक्षासाठी मान्य होऊ शकत नाही.
तर सरकारच अपात्र
शिवेसेनेच्यावतीने कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले की, आमदारच अपात्र असतील तर महाराष्ट्र सरकारच अपात्र आहे. सरकारच बेकायदेशीर आहे तर त्यांचे सर्व निर्णयही बेकायदेशीर आहेत. अधिवेशन बोलवणेही बेकायदेशीर आहे. जर तूम्ही अपात्र आहात तर निवडणूक आयोगाकडे जाऊन उपयोग काय? तुमच्या दाव्यावर निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही. शिंदे गटाच्या सर्व हालचाली बेकायदेशीर आहेत. विधीमंडळात बहुमत म्हणजे पक्षाची मालकी नाही. उद्या कोणतेही सरकार बहुमतावर पाडली जातील. अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच असून तसेच याचिकेत नमूद केले आहे. शिंदे गटाकडे बहुमत जास्त असले म्हणजे याचा अर्थ त्यांचा पक्षावर दावा होत नाही. शिंदे गटाकडून व्हिपचे उल्लंघन झाले, गट वेगळा असला तरी शिंदे गटातील आमदार शिवसेनेचेच सदस्य आहेत.
या आहेत याचिका
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान, राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान, शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप, एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप या आक्षेपावरच्या याचिकांवर सुनावणी सुरु झाली.
हे आहेत १६ आमदार
एकनाथ शिंदे यांच्यासह अब्दुल सत्तार, तानाजी सामंत, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे. यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.