नवी दिल्ली
विरोधीपक्षांकडून केंद्रसरकार विरोधात एकीची मोट बांधली जात आहे.त्यानुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ आयोजित केली असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र नव्याने निर्माण झालेल्या सहकार खात्याची सूत्रे हाती घेणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने आगामी काळात कोणती नवी समीकरणे उदयास येतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पुढील सप्टेंबर महिन्यात गृहमंत्री अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
मागच्या महिन्यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटच्या माध्यमातून या भेटीची माहिती दिली होती. त्यावर राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले होते.मात्र सहकार मंत्रालय स्थापन झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती. मोदींच्या त्या भेटीनंतर बरोबर पंधरा दिवसांनी शरद पवार यांनी शहा यांची भेट घेतली आहे; पण एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विरोधकांची मोट बांधण्यासाठी ब्रेकफास्ट पे चर्चा करत असताना दुसरीकडे साखरेचा हमीभाव यावरून शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणे, त्यात शहा यांचा सप्टेंबर महिन्यात असलेला पुणे दौरा आणि या दौऱ्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देण्यासाठी पवारांनी दिलेले आमंत्रण या घडामोडी तसेच मोदी यांची भेट घेण्यापूर्वी एक दिवस आधी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर पवार यांनीही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच पवार आणि राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर यांच्यातही बैठक झाली होती हा घटनाक्रम पाहता कोणते ‘बेरजेचे समीकरण’ या मागे आहे की राष्ट्रपती पदासाठी ही मोर्चेबांधणी आहे,यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.त्यातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक असणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात झालेल्या भेटीवरूनही तर्कवितर्क सुरु झाले आहेत.