पुणे
बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून असते मात्र या शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे गत ४०० वर्षांची परंपरा तसेच पशुगणनेत कमी होत असलेल्या खिलार जातींच्या बैलांची संख्या या पार्श्वभूमीवर बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे करून पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाले. त्यामुळे हा विषय पुन्हा लांबणीवर पडू नये यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याबरोबर झालेल्या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींचा थरार त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आर्थिक भार सोसून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बैलांची काळजी घेतात. त्यांचे संगोपन करतात याचा व्हिडिओ पशुसंवर्धनमंत्री रुपाला यांना दाखवला. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतींची ४०० वर्षांची परंपरा व संस्कृती यांची माहिती दिली. त्याचप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते या मुद्द्याकडेही लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी बैलगाडा शर्यती आकर्षणाचे केंद्र ठरू शकते आणि त्यातून पर्यटन व्यवसायाला खूप मोठी चालना मिळू शकते हा वेगळा पण महत्त्वाचा मुद्दा मांडला.
बैलगाडा शर्यती बंद पडल्याने यात्रा-उत्सव ओस पडू लागले असून त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने होत आहे याची माहिती केंद्रीयमंत्री रुपाला यांना दिली. तसेच देशी खिलार जातीचा बैल केवळ बैलगाडा शर्यतीसाठी वापरला जातो, त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. परिणामी देशी खिलार जातीच्या बैलांची संख्या पशुगणनेत ५५ टक्क्यांनी कमी झाली आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे खिलार जातीचा हा देशी गोवंश वाचविणे व त्याचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे, ही बाब केंद्रीयमंत्री रुपाला यांच्या निदर्शनास आणून दिली. हा देशी गोवंश वाचविण्यासाठी ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यात यावा अशी मागणी त्यांनी पुन्हा केली आहे.