mns Raj Thackeray pune mns politics forthcoming Pune Municipal Corporation elections

मनसेच्या ‘इंजिन’ ला मतभेदांचा ‘सिग्नल’ !

हेवेदावे आणि नव्या – जुन्यांचा वाद अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या पथ्यावर 
पुणे|  पक्ष संघटनात्मक बांधणीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे स्वतः  लक्ष देत असताना, पुण्यात मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे अजून मिटत नसल्याने आगामी पालिका निवडणुकीत त्याचा पक्षावरच विपरीत परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.
आगामी  पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरु असली तरी मनसेच्या गोटात हवा तसा उत्साह नसल्याचे चित्र आहे.
सध्या मनसेच्या गोटात नवा विरुद्ध जुना वाद उफाळत असल्याने पक्ष संघटनात्मक बांधणीला बाधा निर्माण झाली  आहे. त्यात पक्षातील जुन्या शिलेदारांमध्ये एकोपाही पूर्वीसारखा नसल्याची कुजबुज आहे. त्यात अनेकांमध्ये मतभेदही वाढले आहेत.काहींनी पक्षालाच ‘सोडचिठ्ठी ‘ दिली आहे तर अनेकांनी अलिप्तवादी भूमिका घेतली आहे.
 पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे  पुण्यातील पक्ष संघटनबांधणीकडे स्वतः लक्ष देत असले तरी ज्यावेळी राज ठाकरे पुण्यात येतात, त्यावेळी पक्षात उत्साह वाढतो मात्र ते पुण्यातून माघारी फिरले  कि, पुन्हा निरुत्साहाच्या गर्तेत पक्ष असे चित्र कायम आहे. त्यात स्थानिक पातळीवर पक्षातील पदाधिकारी – कार्यकर्ते यांच्यातील मतभेद मिटविण्यासाठी सक्षम अशा एकमुखी  नेतृत्वाची वानवा आहे. त्यात अन्य पक्षांप्रमाणे गटातटाचे राजकारणही जोरात होत आहे. परिणामी त्याचा फटका मोठ्याप्रमाणावर पालिका निवडणुकीत बसण्याची दाट शक्यताही वर्तविण्यात येत आहे मात्र मनसेला मानणारा मतदारवर्ग हेरून अन्य पक्षातील इच्छुक उमेदवार हे स्वतःचे मतांचे समीकरण जुळविण्यासाठी मनसेतील नाराजांना हाताशी धरून असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे मनसेतील गटबाजी पूर्णतः शमल्यास त्याचा पक्षाला निवडणुकीत फायदा होईल अन्यथा प्रभाग पातळीवर अन्य पक्षांच्या उमेदवारांना ‘रसद’ मिळेल असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
मतविभाजनाचा फटका
तत्कालीन पुणे पॅटर्नचा कारभार पालिकेत सुरु होताना काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या मनसेने पालिकेतील कामगिरी गाजवली मात्र त्यात अनेक विषयात मनसेने सोईस्कर भूमिका वठवत सत्ताधाऱ्यांना साथ दिली.त्यावेळचे स्थानिक पदाधिकारी पैकी आज काहींच्या हाती पक्षाची सूत्रे कायम आहेत तर पक्षाच्या स्थापनेपासून जोमाने काम करणारे अनेक जण आज पक्षाशी फारकत घेऊन लांब आहेत. एकेकाळी २९ नगरसेवक संख्या गाठणाऱ्या मनसेचे आज २ नगरसेवक आहेत.  आता प्रभाग रचना अंतिम  टप्प्यात आहे आणि तीन  सदस्यीय प्रभाग रचनेत हडपसर, कसबा आणि कोथरूड हे तीनच  विधानसभा मतदारसंघ  मनसेला जमेचे ठरणार आहेत.   मात्र पक्षातंर्गत  शह  काटशहाचे  राजकारण  असेच  जोरात पेटत राहिले तर  मतविभाजनाचा फटका मनसेलाच  बसणार असल्याचा दावा राजकीय अभ्यासकांचा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *